भाजपा डिलीमिटेशनवर का बोलत नाही? मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा भाजपा व देवेंद्र फडणवीसांचा डाव..

Delimitation-BJP : वरळीतील मोर्चावर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचा VDO चित्रित करणाऱ्या पत्रकारांना भाजपाकडून धमक्या देण्याचा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.

मुंबई : भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजपाची विचारसणी ही गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट तसेच मनुस्मृतीवर आधारीत आहे व यामध्ये महिलांना अतिशुद्र समजले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्विकार करणाऱ्या मनुवादी विचाराच्या पक्षाने आधी बंच ऑफ थॉट व मनुस्मृतीची होळी करावी व मगच महिला आक्षणावर बोलावे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan Sapakal) यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महिला आरक्षणावर बोलताना भाजपाने महिलांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन कोणता ते स्पष्ट करावे. सावित्रिबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली, त्यावेळी त्यांच्यावर शेणाचे गोळे मारणारे कोण होते हे भाजपाने सांगावे. सावित्रीबाईंचा या तथाकथीत धर्ममांर्तंडांनी छळ केला, त्यामुळे महिलांबद्दल भाजपा दाखवत असलेला पुळका सर्वांना माहित आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच सर्व पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर झालेले आहे, १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत मांडले होते ते डिलिमिटेशनचे होते, या विधेयकाआडून भाजपाला देशाचे तुकडे करायचे होते. तर मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा होता. भाजपाचे नेते डिलिमिटेशनवर काहीच बोलत नाहीत. भाजपाचा हा दुष्ट हेतू इंडिया आघाडीने ओळखला व त्या विधेयकाला विरोध केलेला आहे. भाजपा मात्र विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहे. महिलांना सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण दिले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. महिला आरक्षणाच्या नावावर राजकारण करण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या धमक्यांना घाबरु नका..

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाने वरळीत काढलेल्या मोर्चावेळी एका स्थानिक महिलेने संताप व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांना खडे बोल सुनावले. या महिलेने मोर्चाचा त्रास झाला म्हणून संताप व्यक्त केला व ते सर्वजगभर पसरले. आपली नाच्चकी झाली हे लक्षात आल्याने आता भाजपाचे लोक मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांनाच धमक्या देत आहेत. हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनही पोस्ट केला, तो काँग्रेसकडून कोठून आला अशी विचारणा करण्यात येत आहे. पण अशा धमक्यांना काँग्रेस घाबरत नाही व पत्रकारांनीही भाजपाच्या धमक्यांना घाबरू नये, असेही सपकाळ म्हणाले.

खरगेंच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला…

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे(Mallikarjun Kharge) यांच्या विधानाची मोडतोड करून ते दाखवले जात आहे, खरगे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. नरेंद्र मोदी हे ईडी व सीबीआयच्या मदतीने दहशतीचे राजकारण करत आहेत. भाजपाने या विधानावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे समजते पण निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल आसाममध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काय काय प्रकार केले, त्याकडेही डोळे उघडे ठेवून पहावे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Social Media