मंकी बात – ९

राजकारणाची इतकी घाई ते इकीगाई….  भय  इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते!

२८ जानेवारीला महाराष्ट्राच्या राजकारणात भयानक घटना घडली. त्यात राज्याने अजीत पवार(Ajit Pawar) यांच्यासारखा अनुभवी संवेदनशील नितळ मनाचा नेता गमावला. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच पुन्हा एकदा त्यांचे काका शरद पवार(Sharad Pawar) यांच्या आणि त्यांच्या कुटूंबाच्या राजकीय जीवनात नव्याने दरी निर्माण झाल्याचे सांगणयात येत आहे. २०२४च्या लोकसभेत बारामतीमध्ये अजीत पवार यांच्या पत्नीला ज्यांनी सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास भाग पाडले ( आणि नंतर ही चूक होती अशी कबुली दादांकडून देण्यात आली.)त्यामागच्या शक्ती पुन्हा सक्रीय झाल्या असून त्यांच्याकडून आता शरद पवार यांचा वारसा सांभाळणाऱ्या सुळे यांच्याशी जुळवून घेवू पाहणाऱ्या? मोठ्या भावाच्या राजकारणात नवख्या असलेल्या त्यांच्या विधवा पत्नीला समोर करत नवा ‘राजकीय बाहुल्यांचा खेळ’ ’ऑपरेशन लोटस’ सुरू करण्याचा प्रयत्न केला जावू लागला आहे का? त्यामुळेच ‘भय इथले संपत नाही’ असे राजकीय विश्लेषक विचारू लागले आहेत.

bhay-ithale-sampat-nahi

भय इथले संपत नाही..(bhay-ithale-sampat-nahi)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटीच्या खंडणीचे आरोप करण्यात आले आणि त्यांच्या मागे तपास यंत्रणाचा ससेमिरा लावत त्यांना तुरूंगात डांबण्यात आले होते. त्यानंतर ते सरकार शिवसेनेच्या माध्यमातून पाडण्यात आले हा इतिहास सर्वज्ञात  आहे.

पण २०२३मध्ये भोपाळ(Bhopal) येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी(Modi) यांनी सिंचनाच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे तपास यंत्रणांच्या रडारवर असणारे हसन मुश्रीफ, वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासारखे १०-१२ प्रमुख नेत्यांनी चक्क शरद पवार यांची साथ सोडून देत भाजपचा हात पकडून जाण्याचे मनसुबे प्रत्यक्षात आणले तेच नेते आता विलीनीकरण नको म्हणत आहेत का? असे विचारले जात आहे.

Ajit-Pawar-Famly

सत्तेच्या खेळाची लांडगेतोंड आता जिवघेण्या वळणावर

त्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या केल्या तरी त्यांच्या पुरोगामीपणाची नाळ काही तुटली नाही. आणि त्यांच्यात पुन्हा एकीने राहण्यासाठीचा नवा विचार आता पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर होता का?. मात्र महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणूकीनंतर सुरू झालेली सत्तेच्या खेळाची ही लांडगेतोंड आता जिवघेण्या वळणावर येवून ठेपली आहे. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष नियम कायदे आणि घटनात्मक पक्षांतरबंदीच्या बंधनापलिकडे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालये आणि संविधनाच्या तरतूदी खुंटीला टांगून तोडण्यात आले. त्यानंतरही सत्ताधारी बलाढ्य पक्षांकडून पाहिजे तेवढे सत्तासंख्याबळ मिळत नसल्याने आता पक्षफोडीचा हा खेळ नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे की काय?  अजीत पवार यांच्या अकाली विमान अपघात निधनामुळे सध्या महाराष्ट्रात हा अपघात घडवून आणला गेला की काय? अश्या शंकाचे ‘मोहोळ’ उठल्याच्या चर्चा जाणकार विश्लेषक करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय सद्यस्थिती आणि ‘लांडगे’ तोडीच्या राजकारणाच्या बातम्यांमध्ये सध्या पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ होत असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत,

Sharad-Pawar-and-Ajit-Pawar

माझा काका लई मोठा आहे

पुणे- पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत अजीत पवार यांच्याकडून दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करुन ‘तुझ्या बापा पेक्षा माझा काका लई मोठा आहे’ म्हणत त्यांच्याकडून राजकीय आव्हान देण्यात आले होते. निवडणूका संपल्या की राजकारण संपलं असेही दादा त्यानंतर म्हणाले होते. पण प्रत्यक्षात निवडणुका संपल्या नंतर दादांचे वागणे काही बड्या शक्तीशाली नेत्यांना खटकल्याने ते जे बोलले त्याला कृतीने उत्तर देण्यासाठी त्याच्या उलटच राजकारण त्यांच्या पश्चात सुरू झाले आहे, अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या गोटातच दबक्या आवाजात सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या दोन गटांना एकत्र करून निवडणूका लढायच्या हा मनसुबा मान्य झाला म्हणूनच तो निर्णय अमलात आला होता. त्यानंतर उध्दव ठाकरेंचे जे उदगार ठाकरेंच्या मनोमिलनाच्या वेळी होते तसे ‘एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच’ हा अजित पवार आणि शरद पवार यांचा मनसुबा होता का.? त्याचा अंतिम निर्णय त्यांनी घेतला तो दोन्ही बाजुच्या कुणा नेत्यांना खटकला होता का? मुख्य म्हणजे सध्या सत्तेची ऊब घेणाऱ्या महायुतीच्या काही बड्या नेत्यांना तो मान्य नव्हता का.? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. मूठभर पदाधिकारी आणि नेते महाशक्तीच्या दावणीला बांधले गेल्याने अजित पवार यांच्या ‘सारे काही विसरून पुन्हा पूर्ववत एकत्र व्हायचे’ मनसुबे त्यांच्या पक्षात ज्यांना मान्य नाहीत त्यांच्याकडून नव्याने राजकारण केले जात आहे का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत विलीनीकरण्याच्या या राजकारणाच्या चर्चामध्ये आता मुख्यमंत्र्यानी भाष्य केल्याने भाजपलाही स्वारस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दादा गेले तरी राष्ट्रवादी मागचा ‘राजकीय ससेमिरा’ संपण्याची चिन्ह नाहीत.

Devendra Fadnavis-and-Sunetra-Pawar

डर के आगे अजित है(bhay-ithale-sampat-nahi)

सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्यावर आता अजीत पवार(Ajit Pawar) यांच्या धर्मपत्नी म्हणून कुटूंबाची आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वाच्या अपूर्ण कामगिरीची जबाबदारी येवून पडली आहे. त्यांना माहेर आणि सासरचा मोठा राजकीय वारसा असला तरी त्या स्वत: नुकत्याच दोन वर्षापूर्वी राजकारणात आल्या आहेत. या सध्याच्या राजकारणाला त्यांचे धडाडीचे पती ‘गड्यांनो राजकारण लय वंगाळ त्याच्यापासून दूर रहा’ असे सांगू लागले असताना कठीण काळात त्या मात्र राजकारणात नाईलाजानेच आल्या आहेत. त्यामागेही काही राजकीय अपरिहार्यता आहेतच हे लक्षात घेतले पाहीजे. त्यांच्यावर राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटीच्या प्रकरणात सध्या खटला सुरू आहे. त्यामुळंच पार्थ यांना खासदारकी देण्यासाठी भाजपकडून विरोध होत आहे कारण  अलिकडेच पुण्यात हजारो कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीचे शुक्लकाष्ठ त्याच्यामागं  लागले आहे.  त्यामुळंच ज्या भितीच्या सावटाखाली अजीत पवार महायुतीच्या सोबत आले होते, त्यासावटातून ते आताशा डर के आगे अजित है अश्या अविर्भावात वागू बोलू लागले होते. पण दुर्दैवाने त्यांच्यावर अकाली काळाचा घाला आला. आता त्यांच्या मागे त्यांच्या कुटूंबियाना देखील सुरुवातीला जे अजित पवार जगले त्याच राजकीय अपरिहार्यतेच्या वातावरणात जगावे लागत आहे, हे सारे सहन करताना दादांची आठवण करत ‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते’ अशी सुनेत्रा ताईंच्या आणि परिवाराच्या मनाची सध्या तगमग होत असेल. पण काळ खूप निष्ठूर असतो. बदल्याचे राजकारण भावना, संवदेनाच्या पलिकडचा जिवघेणा खेळ असतो त्याला सामोरे जाताना सारेकाही बाजुला ठेवून जावेच लागते हेच आपण पहातोय.

bhay-ithale-sampat-nahi

‘इतकी घाई’ की ‘इकीगाई’

आपल्या पहिल्याच उपमुख्यमंत्री म्हणून जारी केलेल्या संदेशात त्यांच्याकडून हेच उमटले आहे त्यांनी म्हटले आहे की, आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना‘शिव -शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्याकडून सुरुवातीला अजित पवार यांच्या राज्यातील पद आणि जबाबदारीचा अधिकार घेण्याचा कठीण प्रसंग होता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होण्यासाठी त्यांना उभे रहायचे आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल(Prafull Patel) यांना त्या जागी बसविण्याची घाई आता  पियुष गोयल यांच्या सारख्या भाजपच्या नेत्यांना झाली आहे. यावरून महाशक्तीच्या आजवरच्या लौकीकानुसार पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना ? अश्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.  मात्र ‘पाटील’ चालेल ‘पटेल’ नाही असे म्हणत मनसेच्या राज ठाकरेंसारख्या मराठी नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या ‘मराठा’ नेते कार्यकर्त्यांची भावना व्यक्त होत असल्याने केंद्राची खासदारकी सोडलेल्या सुनेत्रांच्याकडे ही जबाबदारी येणार का? की खासदार असलेल्या तटकरे किंवा छगन भुजबळ यांच्याकडे हे पहावे लागेल. की धुरंधर सासरे त्यासाठी काही खेळी करणार हे देखील महत्त्वाचे आहे.  एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.

Ajit-Pawar-Eknath-Shinde

भाजपा नेते पियुष गोयल(Piyush Goyal) यांनी प्रफुल्ल पटेल(Prafull Patel) यांच्यासंदर्भात विधान केल्यानंतर माफी मागितली आहे. प्रफुल्ल पटेल यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हरियाणातून आलेल्या सुनील अरोराला सध्या पक्षात शिवसेनेच्या मिलींद नार्वेकरांसारखे महत्वाचे मानले जावू लागले आहे. त्यामुळेच पियुष गोयलांपासून आणि भुजबळ, प्रफुल्ल पटेलापर्यत जी काही ‘इतकी घाई’ सुरू आहे ती ‘इकीगाई’ नक्कीच नाही. त्या मागे कुणा महाशक्तीला राज्याच्या विधानसभेत आता पुन्हा स्वत:च्या ‘बहु’मतासाठी पवारांच्या ‘बहु’ची मदत घ्यावी लागत आहे. राजकीय ‘लचके’ तोडण्यासाठी भ्रष्ट  राजकीय लांडग्याच्या टोळक्याची मदत घ्यावी लागत आहे, त्यामुळे गोयल, पटेल यांचा हा उतावळेपणा हे न कळण्यासारखा महाराष्ट्राचा मराठा दुधखूळा नक्कीच नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटातून दादांचे निष्ठावंत देताना दिसत आहेत. अमोल मिटकरी, सुनील शेळके अण्णा बनसोडे, नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या दादाभक्तांना सुनेत्रा ताईच राष्ट्रीय अध्यक्षपदी हव्या आहेत. मिटकरी यांनी तर अजीत पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह लावत या विषयावर वेगळ्याच चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. थोडक्यात ‘अभी नया खेल शुरू हुआ है’ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बरेच काही घडण्याची शक्यता आहे.

 

किशोर आपटे.

(लेखक व राजकीय विश्लेषक)

kishor-apte

मंकी बात – ८

Social Media