मेरी डिग्री का क्या? : पदवी हातात, नोकरी कुठे? रिक्त सरकारी पदांची भरती कधी?: झीनत शबरीन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत
असताना, मुंबई युवक काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मेरी डिग्री का क्या?’
या अभियानाची सुरुवात केली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी गांधी भवन पत्रकार
परिषद घेऊन या अभियानाची माहिती दिली.
युवक काँग्रेस अभियान(मेरी-डिग्री-का-क्या)
देशातील लाखो तरुण उच्च शिक्षण घेऊन पदव्या मिळवत आहेत; मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना
रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. पदवी मिळाली, पण नोकरी कधी मिळणार? सरकारी भरती
कधी होणार? आमच्या भविष्याचे काय? असे सवाल या अभियानाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले
आहेत.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार तरुणांनी प्रतीकात्मक स्वरूपात ‘डिमांड केक’ कापून ‘मेरी डिग्री
का क्या?’ असा सवाल सरकारला केला. वाढदिवसाच्या उत्सवाऐवजी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांकडे लक्ष
द्यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या बोलताना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, आज देशातील तरुणांच्या हातात
पदवी आहे, पण रोजगार नाही. अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत; मात्र भरती प्रक्रिया कधी
सुरू होणार आणि नियुक्ती कधी मिळणार याची निश्चितता नाही. सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे
रिक्त असताना भरती प्रक्रिया वारंवार रखडते. पेपर फुटतात, परीक्षा जाहीर होण्यापासून परीक्षा, निकाल,
कागदपत्र पडताळणी आणि अंतिम नियुक्तीपर्यंत तरुणांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागते.
त्यामुळे सरकारने निश्चित आणि वेळबद्ध भरती कॅलेंडर जाहीर करावे. तरुणांच्या भविष्याशी खेळ न करता
पारदर्शक आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया राबवावी.
हा केवळ एक प्रश्न नाही, तर देशातील बेरोजगार तरुणांच्या भविष्याचा आवाज आहे. आमच्या पदव्यांचे काय,
आमच्या नोकऱ्यांचे काय आणि आमच्या भविष्याचे काय, याचे उत्तर सरकारने द्यावे असे शबरीन म्हणाल्या.
अभियानाचा अँथम आणि वेबसाइट सुरू
या अभियानांतर्गत अधिकाधिक तरुणांपर्यंत हा रोजगाराचा मुद्दा पोहोचवण्यासाठी अभियानाचा अँथम आणि अधिकृत वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.
www.meridegreekakya.com
मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगारी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि सरकारी विभागांतील रिक्त पदांचा मुद्दा व्यापक पातळीवर उपस्थित करण्यात येणार असून वेळप्रसंगी संघर्षही करू असे शबरीन म्हणाल्या
मुंबई युवक काँग्रेस बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर, विशेषतः सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांवर, अभियानांतर्गत भरती आणि महाराष्ट्रातील युवा बेरोजगारीवर लक्ष केंद्रित करत आहे.