लोकशाही मूल्यांचा ऱ्हास थांबवला नाही तर… राहुल गांधींच्या लेखाचा मतितार्थ गोष्ट छोटी डोंगराएवढीच!
देशाचे विरोधीपक्षनेते राहूल गांधी (Rahul-Gandhi-EVM)यांनी मागील सहा महिन्यांपासून जो निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेच्या बाबत मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर पुन्हा एकदा एक लेख लिहून विस्तृत विवेचन केले आहे. देशातील बहुतांश वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवरुन यापूर्वी देखील राहूल गांधी (Rahul-Gandhi)यांच्या या मुद्याची चर्चा, बातम्या आल्या. गांधी यांनी पत्रकार परिषदेत, संसदेत, अमेरिकेच्या दौऱ्यात जिथे जातील तिथे हा मुद्दा लावून धरला आहे.
गोष्ट छोटी डोंगराएवढी?!
गंमत अशी की, ही गोष्ट तशी पाहिली तर छोटीशी आहे, पण डोंगराएवढी आहे, राहूल गांधी त्या मानाने परिपक्व राजकीय नेता आहे हेच त्यातून दिसून येते. सत्तेसाठी नको ते हतकंडे बालीश रंजीश बदल्याचा खेळ हे सगळे महाराष्ट्राने याची देही. . पाहिले, अनुभवले आणि भोगतो आहे. निवडणूक घोटाळा (Election scam)हा विषय कुणा पक्षाचा किंवा कुणा पक्षा विरोधात मुद्दाच नाही, हे पहिल्यांदा समजायला हवे! हाच मुद्दा राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar)पक्षाच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे-पवार आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते प्रवक्ता संजय राऊत(Sanjay Raut) यांनी २०२४च्या विधानसभा निवडणूकीनंतर पत्रकार परिषद घेवून मांडला होता. (नंतर त्यांच्याकडून त्यावर फारसा आग्रह होताना दिसत नाही, हा भाग वेगळा.) त्यानंतर उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही हा मुद्दा मांडला होता. याच मुद्द्यावर मारकडवाडी येथे प्रति मतदान (मॉक पोल) मतपत्रिकेव्दारे घेण्यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता, इतका की देशाचे महान नेते शरद पवार यांची या गावात याच मुद्यावर सभा झाली, अगदी आम आदमी पक्षाचे नेते असोत किंवा देशभरातील इंडिया आघाडीचे नेते असोत त्यांनी मरकडवाडीच्या मुद्यावर भाष्य केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी जाहीर सभेतून या मुद्यावर अगदी अलिकडे गुढीपाडव्याला देखील भाष्य केले होते. मनसेला झालेले मतदान पळविण्यात आल्याचा आरोपच त्यांनी केला होता. अगदी एरवी सर्व प्रस्थापित पक्षांशी मतभेद असणारे वंचित बहुजनचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील हा मतदान घोटाळा असल्याचे सांगत स्वत: न्यायालयात हजर राहून आयोगाकडे संध्याकाळ सहा नंतरच्या मतदानांचे टोकन, सीसीटिव्ही फुटेज किंवा मतदार याद्या हजर करण्याची मागणी केली आहे. पण आयोगाने घाईने अशी माहिती देण्यास टाळाटाळ तर केलीच आहे, पण माहिती देण्या ऐवजी त्याबाबतच्या नियमांत परस्पर दुरूस्ती करून ती गोपनीय माहिती असल्याने देता येत नसल्याचा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकशाहीच्या राजाच्या मत’दान’ चोरीचा घोटाळा? (Rahul-Gandhi-EVM)
तात्पर्य महाराष्ट्रात(Maharashtra) मतदान घोटाळा झाल्याची ही केवळ आवई नाही, याच मुद्यावर उच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगात राज्यातील शंभरपेक्षा जास्त पराभूत उमेदवारांच्या निवडणूक याचिका प्रलंबीत आहेत. त्यात लाखो रूपये नियमानुसार भरल्यानंतरही निवडणूक आयोग फेरमोजणी न्यायालयाच्या आदेशा शिवाय करता येत नाही असे सांगते. न्यायालये तर अण्णाभाऊ साठे यांनीच फार पूर्वी सांगून ठेवले आहे तशी दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांची बटिक झाली आहेत की काय? अशी शंका लोक जाहीरपणे व्यक्त करत आहेत. मग दाद कोण घेणार फिर्याद कुणाकडे करायची? न्याय कोण देणार? मतदार जो लोकशाहीचा राजा आहे त्याचे मत’दान’ चोरीला जात असेल आणि घोटाळा होवून भलतेच निकाल येत असतील तर लोकशाही संपल्याची ही खूणगाठ म्हटली पाहीजे.
…पण काळ सोकावता कामा नये
केवळ एका दोन निवडणूक हारण्या किंवा जिंकण्याचा हा मुद्दा नाही. ‘म्हातारी तर मेली आहे पण काळ सोकावता कामा नये’ असा राहूल गांधी(Rahul Gandhi) यांच्या लेख लिहिण्यामागचा मतितार्थ हा व्यापक आहे. पण महाराष्ट्रात वर उल्लेख केलेल्या कोणत्याही राजकीय पक्षांची हिंमत झाली नाही की राहूल गांधी(Rahul Gandhi) जे सांगत आहेत ते योग्य आहे. महाराष्ट्रात किमान ८५ ते शंभर मतदारसंघातील मतदान प्रक्रियांमध्ये मतदार याद्यांच्या टप्प्यापासून अंतिम मतांच्या आकडेवारी पर्यंत आणि मतदान यंत्रापासून स्थानिक प्रशासनातील हस्तक्षेपापर्यंत घोटाळे करण्यात आले. आणि ज्याला कसेही करून जिंकायचे( बाय हूक ऑर क्रूक) या पध्दतीने मतदानात घोटाळे करून मतदान चोरण्याचा, दरोडा घालण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला आहे. त्याची सुरुवात प्रायोगिक पध्दतीने हरियाणामध्ये झाली, त्याची पूर्ण प्रक्रिया नंतर दिल्ली आणि महाराष्ट्रात राबविण्यात आली. मात्र केवळ भाजप वगळता कोणत्याही पक्षाने राहूल गांधी यांच्या लेखावर विरोधी आणि विसंगत मत व्यक्त केल्याचे दिसत नाही. कदाचित, वास्तविक आज भाजप सुपात आहे आणि विरोधक जात्यात आहेत. त्यामुळे भाजपने राहूल गांधी यांच्या लेखानंतर तळमळीने विरोधात व्यक्तिगत आरोप समजून प्रतिक्रिया देण्याचा उताविळपणा दाखवला, त्याची गरजच नाही. कारण हा मुद्दा केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग(State Election Commission) या स्वायत्त यंत्रणेच्या कामकाजातील घोटाळ्यांचा आहे. त्यांचा प्रतिवाद करण्यास ते सक्षम आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यावर तेथे सुनावणी सुरू आहे. पण अभिनेता गोंविदाचे जसे गाणे आहे तसे ‘तुझे मिर्ची लगी तो मै क्या करु?’ असे त्यांना म्हणता आले असते. पण गोष्ट तशी नसावी, मग सत्तेवर बसून खाता खाता मिर्ची लागल्यासारखे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष, मुख्यमंत्री राहूल गांधीवर प्रतिक्रिया देवू लागले, अगदी रा. स्व. संघाची गरजच नाही म्हणणारे जेपी नड्डा(JP Nadda) यांनी देखील यावर प्रतिक्रिया राहूल गांधी यांच्या विरोधात दिली. जे अनाकलनीय आहे. वास्तविक लोकशाहीमध्ये सजग प्रहरी असलेल्या भाजप सारख्या साधनशुचित्वाच्या गप्पा मारणाऱ्या पक्षाने म्हणायला हवे की देशाचे विरोधी पक्षनेते आकडेवारीसह जर वारंवार हा मुद्दा लावून धरत असतील तर आयोगाने सक्षम यंत्रणा वापरून त्यात लक्ष घातले पाहीजे. निकोप लोकशाहीसाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. पण परिपक्व (समजल्या जाणाऱ्या?) राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही अश्या अपेक्षा करायची आज सोय राहिली नाही. आज भाजप सत्तेवर असली तरी भविष्यात कायम कुणी सत्तेवर राहत नाही त्यामुळे वाजपेयी म्हणाले होते तसे ‘हम रहे ना रहे मग यह देश यह लोकतंत्र जिंदा रहना चाहिये’ मात्र देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) असो किंवा बावनकुळे त्यांची भुमिका या मुद्यावर परिपक्वता दाखवून राजकीय पध्दतीने प्रतिवाद करण्याचे प्रयोजनच नव्हते, नाही का?
सत्ताधिशांचा नैतिक-वैचारिक केमिकल लोच्या?
पण लोकशाही आता नितीमत्ता गुणवत्ता नैतिक विचार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘नेशन फर्स्ट’ ची भावना सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये राहिली नसल्याचे हे उदाहरण म्हणायला हवे. राहूल गांधी असोत किंवा अन्य राजकीय पक्ष ते विधानसभा निवडणूक ‘घोटाळा झाल्याने’ हरले असले तरी त्यांचा आग्रह मतदान यंत्रणामध्ये घोळ नसावा हा आहे. भाजप असो किंवा कोणताही पक्ष, शेकडो हजारो वर्ष सत्तेवर असणार नाही. ज्यावेळी त्यांच्याकडे विरोधीपक्षांची भुमिका होती त्यावेळी अगदी लालकृष्ण आडवाणी पासून सुब्रमण्यम स्वामी पर्यंत आणि किरिट सोमैय्या पर्यंतचे नेते इवीएम(Rahul-Gandhi-EVM) कसे पारदर्शी नाही यांचा ‘डेमो’ देत फिरत होतेच ना? हा काही फार जुना इतिहास नाही. पण सत्तेवर येताच त्यांचा जर नैतिक वैचारिक इतका केमिकल लोच्या झाला असेल? तर न जाणो कधी त्यांना पु्न्हा विरोधी पक्षात जायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्यावर अशीच निवडणूक यंत्रणातील घोटाळ्याची दुहाई देत फिरण्याची वेळ येणार नाही? लोकशाहीत राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही पंधरा दिवसापूर्वी जे ट्रम्प(Trump) जगाला शहाणपणा सांगत होते त्यांच्याच सहकारी मित्राने इलॉन मस्क(Elon Musk) ने त्यांच्या विरोधात दंड थोपटल्याने ट्रम्प काका महाभियोगासारख्या अडचणीत आले आहेत. पण ती अमेरिका(America) आहे, तेथे खऱ्या अर्थाने सजग नागरिक आणि सशक्त लोकशाही यंत्रणा राबविण्याचा प्रयत्न केला जातो.
कालपरवा पर्यंत भारतात देखील टि एन शेषन यांच्यासारखे लोक लोकशाहीच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र सध्या लोकशाही संस्थामध्ये स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांचा भराणा झाल्याने लोकशाही मूल्यांचा दर्जा राखण्यात ते कमी पडले आहेत. देशात अश्या प्रकारे अराजक येण्यास वेळ लागणार नाही. या देशात कोणत्याही पक्षाचे शासन असो ते लोकांच्या हितासाठी नैतिकतेवर आधारीत असायला हवे या संविधानकारांच्या सदसदविवेक आणि समानता या मुल्यांचा पुरस्कार आपण कधी करणार आहोत की तात्पुरत्या फायद्यासाठी अनैतिक भानगडी करत राहणार आहोत?. याची जाणीव प्रत्येक क्षणाला ठेवायला हवी पण सध्या सत्ताधारी पक्षांकडून उदात्त विचार, दूरदृष्टी, व्यापक समाजहित या अपेक्षा करण्यात काहीच हशील नाही हे गेल्या चार पाच वर्षात जे काही घडले त्या बालिश, अनैतिक आणि लोकशाही विरोधी कृती आणि घटनावरुन स्पष्ट झाले आहे.

प्रज्ञावंताची स्थिती सहन होत नाही – सांगता येत नाही!
गंमत अशी की सरन्यायाधीशांने शिंदे यांचे सरकार सत्तेवर बसणे अनैतिक ठरवल्यानंतरही भाजप त्यांच्यासोबत चिकटून बसते. आपल्या राज्यपालांच्या कृत्यांना असंविधानीक ठरवल्यानंतर या पक्षाकडून पश्चाताप किंवा चूकांची दूरुस्ती करण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही हे कश्याचे लक्षण समजायचे? रा स्व संघाने कधी अश्या पध्दतीने सत्तेवर येण्याचे स्वप्न नक्कीच बघितले नसेल पण त्यांच्याकडच्या प्रज्ञावंताची स्थिती देखील सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशीच करून ठेवली असावी असे जाणकार सांगतात. पक्षाच्या अध्यक्ष निवडीच्या सद्यस्थितीवरुन ते दिसलेच आहे. एवंच फार मनाला लावून घेवू नका. हे दिवसही जातील आणि सुशासनाचा सूर्य नक्कीच उगवेल, असे याबाबत प्रज्ञावंत संघ विचारांच्या काही जणांचे मत पडले.
पण राहूल गांधी(Rahul-Gandhi) यांच्यासारखे काजवे जळतात तेच त्यांच्या लेखातून, भाषणातून सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात. लोकशाही मुल्यांचा ऱ्हास थांबवला नाही तर येणाऱ्या पिढ्या कुणालाच माफ करणार नाहीत. आज जे मस्तवाल बेधुंद राजकारण हाकतील पण इतिहासात त्यांचे नांव काळ्याकुट्ट अक्षरात नोंदले जाणार आहे इतके समजत असेल तरी खूप मिळवले असे काही होईल, नाही का? आशा करुया.
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)