Mumbai-High-Court:ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडली बाजू : २५ जूनला निकाल
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात(Mumbai-High-Court) महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात आज सुनावणी झाली. यात ॲड. प्रकाश आंबेडकर(Adv. Prakash Ambedkar) यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली तीव्र भूमिका मांडली आहे. त्यांनी यापूर्वीही निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता. १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व इतर विरोधी पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम वापर तसेच १९६१ मधील निवडणूक नियमांत झालेल्या संशोधनाविरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर(Adv. Prakash Ambedkar) यांनी असेही नमूद केले होते की, ही ७६ लाख मतांची आकडेवारी फक्त ‘चूक’ नाही, तर ती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
याचिकाकर्ता चेतन अहिरे यांचा आरोप आहे की, मतदान संपल्यानंतर आकस्मिकरीत्या ७६ लाख मतांची नोंद झाली, जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही. या प्रकरणी निवडणूक आयोग, केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी न्यायालयात (Mumbai-High-Court)आपली भूमिका मांडली आहे.