महाराष्ट्राचे दोनच राजकीय यक्ष प्रश्न? इथेच ग्यानबाची मेख आहे?!

पहलगाम(Pahalgam) आणि भारत पाक युध्दजन्य (India-Pakistan War)स्थितीनंतर गेल्या पंधरा दिवसांत देशात गुडन्यूज नाहीतर बॅड न्यूजची रिघच लागली आहे. आधी बंगळूरू(Bengaluru)मध्ये चे़गराचेंगरीत अनेकांचा बळी गेला, ते होत नाही तोच मुंबईत मुंब्र्याजवळ लोकलमधून पडून ४-५ प्रवाशांचा अंत झाला आणि आता अहमदाबादचे विमान क्रॅश(Ahmedabad plane crash) होवून शेकडोंचा अंत झाला इतका की त्यांचे शव ओळखणे कठीण झाले. या साऱ्या घटना ज्योतिषांच्या मते राहू-केतूंच्या राशी परिवर्तनाने झाल्या आहेत. तर विरोधकांच्या मते सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्या आहेत. तर विद्वानांच्या मते त्या तांत्रिक दोष आणि त्रुटींमुळे झाल्या असाव्यात अश्या डिबेट चर्चा सध्या डिजीटल आणि मेनस्ट्रिम माध्यमांतून होताना दिसत आहेत.
सगळे प्रश्न बाजुला, दोनच कळीचे मुद्दे?
पण राज्यात मात्र सध्या सगळे प्रश्न बाजुला पडून दोनच कळीचे मुद्दे यक्ष प्रश्न आहेत, किंवा असावेत अशी स्थिती आहे. ते कोणते तर १) काका-पुतण्यांची युती किंवा विलय होणार की नाही? तर दहा जूनला दोन्ही पक्षांनी पुण्यात वर्धापन दिन साजरा केला आणि अजून तीन महिने काही होत नसल्याचे स्वत:च संकेत दिले. देशाच्या विकासामध्ये भागीदारीसाठी दोघांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एकमत तर केले आहेच. एक उघड भाजप सोबत आहेत, दुसरे अप्रत्यक्ष अडाणीचे समर्थक आहेत असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे इकडे फारसा प्रश्न नाहीच!
मात्र दुसरा यक्षप्रश्न होता, अर्थातच दोघा चुलत भावांची एकी किंवा राजकीय विलय होणार का? माध्यमांच्या भट्ट्यांवर अहोरात्र याच विषयांचा रतिब आणि रांधारांध सुरू आहे. त्यातून उत्तरे मात्र सापडताना दिसत नव्हती. आणि अचानक बारा जून रोजी वांद्र्याच्या हॉटेल ताज लँडस मध्ये ‘वास्तव मे ट्रुथ’ समोर आले! मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यात तास दीड तासांची चर्चा झाली आणि खरेतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या चर्चेत विधानसभा निवडणूकीत मतदान पळवापवळीचा नॅरेटिव्ह कसा खोटा आहे, त्याची चर्चा झाली तर महायुतीमध्ये मनसेचा कसा फायदा होवू शकतो याची देखील मांडणी झाली म्हणे! तरीही महाराष्ट्र धर्मासाठी ‘सगळे मराठी एकत्र’ येणार की नाही? हा प्रश्न सध्या प्रश्नच राहणार आहे.
. . . आणि मुख्यमंत्री सक्रिय झाले!
नोव्हेंबर २०२४मध्ये राज्यात सत्ताधारी महायुतीला बंपर जनादेश मिळाला. त्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका मागील चार वर्षापासून राज्यात रखडल्या होत्या त्यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून सप्टेंबर पूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश आला. त्यामुळे विधानसभेनंतर जी राजकीय स्थिती समिकरणे होती ती नव्याने मांडण्याची शक्यता दिसू लागली, त्यातूनच मग या साऱ्या चर्चा कयास आणि विधाने यांना गती येवू लागली होती. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला वीस पैकी दहा जागा मुंबई परिसरातून मिळाल्याने महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत शिंदे-मनसेला भाजप सोबत म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यांच्या अभ्यासातून हे लक्षात आले. मुंबई महापालिका निवडणूक झाली तर भाजप पेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेला जनाधार जास्त मिळण्याची शक्यता आहे. (असे सर्वेक्षणाचे मत आहे?) त्यामुळे विधानसभेत शिंदेसाठी मनसेला दूर ठेवायची चूक केल्याचे भाजपच्या लक्षात आले आहे असे जाणकारांचे मत आहे. महायुतीमध्ये मनसे यावी यासाठी मग प्रयत्न सुरू झाले. पण वर्षावर येण्यास राज ‘ना’ राज’ असल्याचे समजले, तर शिवतिर्थावर आता जावून बोलण्यात भाजपच्या नेत्यांना हशील वाटेनासे झाले, त्यामुळे एकदा बाहेर भेटून चाचपणी करण्याचे ठरले म्हणे. त्यापूर्वी वांद्रे(Bandra) ते दादर(Dadar) हॉटलाईन सुरू झाली होती, प्रश्नोत्तरांच्या याद्या एकमेकांना पाठवून परिक्षा पूर्ण झाल्या होत्या तर जवळ जवळ येण्याची प्रक्रियासुध्दा सुरू झाली होती म्हणे!
मात्र विधानसभेत माहिम मध्ये ‘राज’ पूत्रांचा पराभव झाल्याने मनसेच्या नेत्यांना तो जिव्हारी लागला होता. त्यांची भाषा काहिशी भाजप विरोधी झाल्याचे पहायला मिळाले. तर तो पराभव उबाठा ने केला होता हे ‘वास्तव मे ट्रुथ’ नाकारता येत नव्हते. त्यानंतर मग ‘महाराष्ट्र धर्म’ आणि ‘एकला चलो’ दोन्ही चा राग आळवून त्यांनी आपली बार्गेनिंग पॉवर वाढते का? याची चाचपणी केली. त्याला ठाकरे आणि भाजप कडूनच नव्हे, तर पवारांच्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीत मनसे आली तर हरकत नाही अशी मनोभुमिका मांडली जावू लागली होती, शिंदे सेनेकडून या चर्चा थांबविण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू होता, पण जमत नसावे मग नवी दिल्लीत संदेश गेला म्हणे! तिथून फर्मान आले असावे आणि मुख्यमंत्री सक्रिय झाले असे सू्त्रांचे मत आहे.
सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी त्यांची ‘हवा’?
आता या राजकीय खेळात राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी कुणासोबत जायचे? याचा निर्णय ते घेतीलच. मात्र त्यांचा प्राधान्याचा पर्याय भाजपच असणार असे मानले जात आहे. मात्र त्यांच्या राजकीय प्रकृतीकडे पाहिले तर त्यांच्या पक्षाचे राजकीय अस्तित्व तसे म्हणायला गेले तर ‘गणती’तच नसल्यासारखे आहे. निवडणूंकाच्या मतांची टक्केवारी ते विजयी जागांबद्दल त्यांच्याकडे सांगण्या बोलण्यासारखी स्थिती नाही. मात्र त्यांच्या सभांना तुडूंब गर्दी असते, सोशल मिडीयात त्यांच्या अर्काईव भाषणांची लाट असते. अगदी खाजगी आणि सरकारी गुप्त सर्वेक्षणात त्यांच्याकडे सत्ताधारी पक्षांनी लक्ष द्यावे अशी त्यांची ‘हवा’ असल्याचे सांगण्यात येत आहे. गेला बाजार सर्वेक्षणातून त्यांना मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली संभाजीनगरात २.५ टक्के जनाधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या आघाडीची शक्ती ४८ टक्के तर महायुतीची ४९.५ टक्के आहे. ज्यांच्या सोबत मनसे जोडली जाईल त्यांना सुमारे २.५ टक्के अधिकची मते मिळू शकतात. इथेच राजकारणाच्या ग्यानबाची मेख आहे म्हणे!
घोडं त्यासाठीच आडले आहे?
मनसेची बार्गेनिंग पॉवर ओळखून त्यांच्याशी फायद्याच्या चर्चा सध्या फक्त शिंदे शिवसेना आणि भाजप महायुती करू शकते. उबाठा सोबत मनसे कडून मागच्या अनुभवांचा पाढा मोजला जातो. भविष्यात दोघांना मिळून मुंबईची सत्ता मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यात अडचणी धोके आहेत. इतका संघर्ष करुन महाशक्तीशी टक्कर द्यायची? की पतली गली पकडून सोयीचे राजकारण साधायचे? हा पर्याय पुन्हा खुला आहेच. सत्तेपासून वंचित असलेल्या मनसेला नवी भरारी घेण्यासाठी एका मुलाखतीच्या त्या वक्तव्यांतून नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा लाभ चाणाक्ष नेते नक्कीच घेणार हे उघड आहे. मात्र मुख्य अडचण आहे ती स्वत:च सुरू केलेल्या चर्चा, महाराष्ट्र धर्माची आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, तेथे काय आणि कसे सामोरे जायचे? हा खरा प्रश्न आहे. घोडं त्यासाठीच आडले आहे? असे जाणकार सूत्रांचे मत आहे.
‘त्यात सर्वाचे हित असेल’!
मुंबई एमएमआर (MumbaiMMR)परिसरात नजिक भविष्यात ज्यांच्याकडे स्थानिक सत्तेच्या चाव्या असतील त्यांच्या हाताखालून सुमारे पाच लाख कोटींच्या विकासांचे प्रकल्प पाच वर्षात साकारणार आहेत. मग ते वाढवण बंदर असो, पालघर विमानतळ(Palghar Airport) असो नवी मुंबई विमानतळ(Navi Mumbai Airport) असो बुलेट ट्रेन(Bullet Train) किंवा नवा समृध्दी महामार्ग कॉरिडॉर(New Samriddhi Highway Corridor) असो. किंवा धारावी विकास प्रकल्प असो. केंद्रात सत्ताधिश असलेल्या पक्षांशी जुळवून घेणारे पक्ष स्थानिक राजकारणात सत्तेवर असतील तर ‘त्यात सर्वाचे हित असेल’ असे या जाणकार सूत्रांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘नाहीतर २०१९ नंतर जसे आरे मेट्रो पासून, नाणार प्रकल्पा पर्यंत विकास कामांच्या स्थगितीचे राजकारण झाले तसेच पुन्हा घडले तर ते कुणालाच परवडणारे नसेल.’
त्यामुळेच महाराष्ट्रात सध्या दोनच प्रश्न यक्ष प्रश्न झाले आहेत. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर राजकीय नेते आणि पक्ष यांचे लक्ष आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात पुन्हा चुरस असेल आणि निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा असणे स्वाभाविक आहे. तर अस्तित्वाचा प्रश्न असल्याने विरोधकांना संघर्षाची शेवटची संधी हातून जावू देवून चालणार नाही. त्यात आता पहायचे सुज्ञ मतदार जनता जनार्दनाच्या मनात काय आहे? तो कुणाच्या सोबत जाणार आहे? त्यावर बरेच काही लाभा-लोभाचे निर्णय होवू घातले आहेत. तुर्तास इतकेच!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)